Search AbideInSelf

Total Pageviews

Thursday, March 13, 2014

अनुसंधान- श्री निसर्गदत्त महाराज

श्री निसर्गदत्त महाराजांच्या "सुखसंवाद" (I AM THAT) ह्या अतिशय लोकप्रिय पुस्तकातील ७६ ते १०१ या संवादातील निवडक बोधवचने सचिन क्षिरसागर ह्यांनी संकलित करून "अनुसंधानही पुस्तिका रवींद्र कात्रे ह्यांनी नुकतीच प्रकाशित केली आहे.

खालील ठिकाणी आणि निवडक पुस्तक वितरकांकडे उपलब्ध.

रवींद्र कात्रे: ९५५२५-२५४३१ Email: rbkatre@gmail.com








अनुसंधान प्रस्तावना

सर्व वाचक, साधक मित्रांना नववर्षच्या हार्दिक शुभेच्छा.

ज्याला जे-जे हवे ते-ते सर्व मिळावे, 
पण त्याला... 'नक्की काय हवे'... 
ते मात्र लवकरात लवकर कळावे...!


काय हवे आहे आपल्याला नक्की!? काय शोधतो आहे आपण नक्की!? आध्यात्मिक शोध म्हणजे नक्की काय!? कशासाठी आध्यात्म? काय मिळवायचे आहे आपल्याला नक्की? खरंच... आपल्याला 'हे' माहिती आहे काय? सर्वसामान्य पणे कोणीही म्हणेल कि मी, शांती, समाधान किंवा आनंदाच्या शोधात आहे... तर कोणी म्हणेल कि मी स्वरुपज्ञानाच्या शोधात आहे. पण मग ही शांती म्हणजे नक्की काय... हे समाधान म्हणजे नक्की काय... हा आनंद म्हणजे नक्की काय आहे ह्यावर थोडासा विचार, चिंतन, मनन करण्याची आवश्यकता आहे असे वाटते. हे 'स्वरुपज्ञान' म्हणजे नक्की आहे काय आणि ह्या स्वरुपज्ञानाची, आत्मज्ञानाची खरंच गरज आहे का आणि काय आहे ह्यावर सखोल चिंतन होणे गरजेचे आहे असे वाटते. अन्यथा कितीही जरी आध्यात्मिक प्रवास आणि प्रयास झाला तरी ज्याचा आपण शोध घेत आहोत ती 'सदवस्तू' आपल्याला कधी मिळेल ते सांगता येणार नाही आणि मिळाली तरी त्याची खूण कशी पटणार? त्या सदवस्तूची आपल्याला निदान शब्दाने तरी ओळख पटणे आवश्यक आहे आणि म्हणुनच येथे 'अनुसंधान' ह्या पुस्तिकेच्या माध्यमातून सदगुरु श्री निसर्गदत्त महाराजांच्या वाणीतून प्रकटलेले अनमोल्य बोध-वचने आपल्या समोर मांडताना मला आत्यंतिक आनंद होत आहे.

सदगुरु श्री निसर्गदत्त महाराज मुंबईमध्ये (१८९७-१९८१) त्यांच्या खेतवाडीमधील निवासातून, देशी आणि विदेशी साधकांशी आध्यात्मिक संवाद साधत राहिले. त्यांची मूळ शिकवण फक्त एका वाक्यामध्ये जर सांगायची झाली तर ती म्हणजे "स्वः ला जाणा आणि स्वस्थ व्हा." कोणालाही कोठ्ल्याही साधनांमधून जर काय साधायचे असेल तर तो म्हणजे 'आत्मबोध'... 'स्वरुपबोध'... आपल्याला आपण नक्की कोण आहोत ह्याचा सत्य-नित्य बोध. कोठल्याही आध्यात्मिक साधनांची परिणीती काय आहे तर तोच हा 'आत्मबोध'. आपल्याला आपण ओळखल्याशिवाय परम्-शांती, परम-आनंद,परम्-समाधान मिळू शकत नाही हेच श्री निसर्गदत्त महाराजांना सांगायचे आहे. एक आहे बाह्यांगी शोध ज्यामध्ये सांसारिक सुख मिळू शकतात परंतु ती सर्व सुखे हि केवळ क्षणिक समाधान देतात आणि प्रत्येकाला सुख्-दुखांच्या भोवर्यात अडकवून टाकतात. बाह्यांगी शोधाची निष्फलता, निरर्थकता जशी लक्षात येऊ लागते तशी आपसुकच आंतरिक शोधाची सुरवात होऊ लागते. एकदा ह्या शोधाची सुरुवात झाली कि त्याची आत्यंतिक तळमळ साधकाला त्याच्या मूळ-स्थिती पर्यंत नक्कीच घेऊन जाते आणि त्याला सर्व बंधनांमधून कायमचे मोकळे करते.

साधकाच्या सर्वच्या सर्व दुखांचे मूळ म्हणजे त्याचे देहतादत्म्य आणि मनाशी तद्रुपता हेच आहे. देह-मनाच्या विळख्यामधून मोकळे होण्यासाठी नेमाने आणि निश्चयपूर्वक ध्यान साधना करण्यास श्री निसर्गदत्त महाराज पुन्हा पुन्हा सांगत आहेत. ते सांगत आहेत कि, " नियमित ध्यानाचे मोल असे आहे की, ते तुम्हाला दैनंदिन जीवनाच्या कंटाळवाणेपणापासून दूर नेते. तसेच तुम्हाला सतत स्मरण देते की, तुम्ही स्वतःला जसे समजता तसे तुम्ही नाही." आध्यात्मामध्ये कळकळ अत्यंत महत्त्वाची आहे. श्री महाराज म्हणतात, "शिष्याचा प्रामाणिकपणा आणि कळ्कळ यांलाच महत्त्व असते. स्वरुपज्ञानासाठी तळमळ ही मुख्य अट आहे". श्री निसर्गदत्त महाराजांचा एक एक शब्द म्हणजे जणू दुधारी तलवार आहे. आपले लक्ष कोठे आहे त्यावर आपल्याला काय दिसणार हे निश्चित असते. त्यामुळे जो साधक सावध राहून ही बोधवचने वाचेल तो नक्कीच मृत्यूच्या काल्पनिक भीतीपासून वाचेल.

"अनुसंधान" ह्या पुस्तिकेतील सदगुरु श्री निसर्गदत्त महाराजांच्या बोध्-वचने साधकांना आपल्याच मूळ-स्थिती पर्यंत जाण्यासाठी पूर्वाभ्यास म्हणून किंवा पूर्व-तयारी होण्यासाठी अत्यंत मार्गदर्शक ठरतील यांत शंका नाही. ह्या पुस्तिकेतील योग, ध्यान, जप इत्यादी साधनांविषयी श्री निसर्गदत्त महाराजांची वचने अतिशय उद्बोधक आहेतत्यांवर सखोल चिंतन आणि त्यांचा ध्यास घेतल्यास साधकमित्र आपल्याच विसरलेल्या अद्वैत अशा परमात्मस्वरूपापर्यंत पोहोचतील हे निश्चीत आहे.

श्री निसर्गदत्त महाराजांच्या "सुखसंवाद" (I AM THAT) ह्या अतिशय लोकप्रिय पुस्तकातील ७६ ते १०१ या संवादातील निवडक बोधवचने सचिन क्षिरसागर ह्यांनी संकलित करून "अनुसंधानही पुस्तिका रवींद्र कात्रे ह्यांनी नुकतीच प्रकाशित केली आहे. ह्या दोघांनी सदगुरुसेवेसाठी घेतलेल्या अथक परिश्रमांबद्द्ल त्यांचे हार्दिक अभिनंदन.

सदगुरु शरण: 
                                                                                                                                   
जो ... हरी चरणी शरण गेला तो... कायमचाच हरवून गेला.... हरि होऊन गेला.                           
हरि चरण म्हणजेच सदगुरु चरण आणि सदगुरु चरण म्हणजेच सदगुरु वचन. सदगुरु म्हणजेच सर्वस्व
सदगुरु वचन हेच सर्वस्व. सदगुरु वचनाशी बांधिलकी... सदगुरु वचनाशी तादात्म्य... सदगुरु वचनाशी अनुसंधान म्हणजे... ज्ञानाची अशी ज्योत ज्याने अज्ञानरुपी अंधकार कायमचा मिटून जातो. जय गुरु.

सप्रेम शुभेच्छा

नितीन राम                                                                                                                                        
०५ जानेवारी २०१३
www.abideinself.blogspot.in

NEW ENGLISH  BOOK BASED ON CONVERSATIONS WITH 
SRI. NISARGADATTA MAHARAJ "Nothing is Everything"...releasing shortly.